वादळी पावसामुळे शेतीचे नुकसान – खासदार स्मिताताई वाघ यांची तात्काळ दखल.


अमळनेर– काल जळगाव लोकसभा मतदारसंघातील अनेक भागांमध्ये अचानक आलेल्या वादळी वाऱ्यांसह पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. केळी, पपईसारख्या नगदी पिकांचे बागायती क्षेत्र जमीनदोस्त झाले असून, काही ठिकाणी जनावरांच्या मृत्यूचीही नोंद झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक भार पडला आहे.

या परिस्थितीची तात्काळ दखल घेत खासदार स्मिताताई वाघ यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. त्यांनी नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश देण्याची विनंती केली आहे.
खासदार वाघ यांनी आज विविध गावांमध्ये जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी शेतकरी बांधवांची भेट घेत, त्यांचे दुःख समजून घेतले आणि त्यांना धीर दिला. या पाहणी दौऱ्यात महसूल व कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. दौऱ्यात खासदार वाघ यांनी तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी व ग्रामसेवकांना स्पष्ट निर्देश दिले की, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे त्वरित पंचनामे करून अहवाल शासनाकडे सादर करण्यात यावा, जेणेकरून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदतीचा हात मिळू शकेल.