जिल्ह्यात ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी’ अभियान राबविण्यात यावे‌- जिल्हाधिकारी आयुष प्रसाद..

0

९ सप्टेंबर रोजी कार्यक्रमाचे नियोजन

जळगाव(प्रतिनिधि)- जिल्ह्यात दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी अभियान राबविण्यात यावे‌. अशा सूचनाही जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज येथे दिल्या.

दिव्यांग कल्याण अभियानाची आढावा बैठक आज जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, जिल्हा समाज कल्याण अधिकारी विजय रायसिंग, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता भारत चौधरी तसेच अभियानाचे सदस्य उपस्थित होते.

श्री.प्रसाद म्हणाले की, दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी या अभियानाचा जिल्हास्तरीय कार्याक्रमाचे ९ सप्टेंबर २०२३ रोजी आयोजन करण्यात यावे. या कार्यक्रमाची परिपूर्ण तयारी करण्यात यावी. या कार्यक्रमांचे नियोजन करतांना पावसाळयाचे दिवस लक्षात घेता दिव्यांग लाभार्थ्याचे गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी.
शासनाच्या इतर विभागांच्या अधिकाऱ्यांनी दिव्यांग लाभार्थ्यांना दिलेल्या लाभाची यादी दिव्यांग विभागाकडे सादर करावी. कार्यक्रमाच्या दिवशी दिव्यांग व्यक्ती हा ४० टक्के ते ६० टक्के च्या आतील असावा वयोवृध्द व लहान मुले तसेच अतितीव्र दिव्यांग यांना बोलविण्यात येऊ नये. अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री.प्रसाद यांनी यावेळी केल्या.

श्री.प्रसाद म्हणाले की, दिव्यांग लाभार्थी याना कार्यक्रमाच्या ठिकाणी आणण्यासाठी तालुकास्तरावरुन नगर परिषद मुख्याधिकारी, गट विकास अधिकारी यांनी आपल्या स्तरावरुन वाहन व्यवस्था करुन दिव्यांग लाभार्थी यांना कार्यक्रमस्थळी पोहचविणे व घेऊन जाण्याची जबाबदारी घ्यावी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता व जिल्हा शल्य चिकित्सक यांनी सदर अभियानाच्या दिवशी दिव्यांग लाभार्थ्याना त्या दिवशी यूडीआयडी देण्याची व्यवस्था करावी. या कार्यक्रमाचे परिपूर्ण नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी संबंधित यंत्रणेला दिल्याआहेत..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!