बाजार समितीत गैरप्रकार सहन करणार नाही.. -बैठकीत पावित्र्य राखले पाहिजे. -सभापती अशोक पाटील.

अमळनेर /प्रतिनिधि

अमळनेर(प्रतिनिधि )
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्वच संचालक सत्ताधारी असून सत्ताधारी व विरोधक असा विषयच नसल्याने गटातटचा प्रश्नच येत नाही असा दावा सभापती अशोक आधार पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.मात्र गेल्या काळात मार्केटमधील गाळे लिलावात अनियमित कारभार झाल्याचा भांडाफोड करीत यासाठी चौकशी समिती नेमण्याचा इशारा त्यांनी दिला.
बाजार समितिबाबत काहींनी उलटसुलट प्रचार सुरू केल्याने यासंदर्भात खरी परिस्थिती मांडण्यासाठी अशोक पाटील यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी बोलताना ते म्हणाले की मंत्री महोदय ना.अनिल पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जनतेने त्यांच्या पॅनलला बहुमत दिले असुन त्यानंतर राज्यात झालेल्या घडामोडी मुळे विरोधातील संचालक देखील सहयोगी झाले आहेत. मी सभापती झालो तेव्हापासून आम्ही पाच सहा महिन्यांतच कारभाराची पद्धत बदलून त्यात पारदर्शकता आणली आहे. प्रत्येक महिन्याला अजेंड्यावर येणारे विषय,त्यावर सविस्तर चर्चा,प्रत्येक महिन्यात खर्च झालेल्या रुपयांन रुपयाचे वाचन करून मंजूर केले जाते. अल्पावधीतच याठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय नसताना आम्ही शेतकरी, हमाल माथाडी ,व्यापारी आदी सर्वांसाठी आर.ओ.चे शुद्ध व थंडगार पाणी
स्वखर्चाने उपलब्ध करून दिले. मुख्य प्रवेशद्वार ला बळीराजा नामकरण करून शेतकऱ्याचा सन्मान दिला, शेतकऱ्यांचा मोफत पिक विमा तो देखील मार्केटवर कोणताही बोजा न पडता काढला गेला, मार्केटमधील धान्य व संपत्तीच्या संरक्षणाची बाब म्हणून सीसीटीव्हीचे नियोजन केले, समितीची भविष्यातील आर्थिक बचत म्हणून सोलर चे काम प्रोसेस मध्ये आहे, यासाठी ना.अनिल दादा पाटील यांच्या मदतीने डीपीडिसी मधून एक कोटी निधी उपलब्ध होणार आहे. मार्केट ला येणाऱ्या शेतकरिंसाठी भव्य निवास आणि भोजनालय साठी प्रस्ताव तयार असून 50 टक्के सबसिडीवर पणन मंडळाकडून सदर योजना मिळणार आहे.
याव्यतिरिक्त अमळनेर तालुक्यास ना.अनिल पाटील यांच्या रूपाने प्रथमच मंत्री पदाचा बहुमान मिळाल्याने पहिला नागरी सत्कार समारंभ मार्केट मध्ये घेण्यात आला, कापसासाठी महिलांचे प्रशिक्षण आणि सोसायटीचे चेअरमन व व्हा चेअरमन यांचेदेखील प्रशिक्षण आपण घेतले. गणेशोत्सवात केदारनाथची प्रतिकृती सादर करून ग्रामीण व शहरी गणेशभक्तांना सोई उपलब्ध करून देत मने जिंकली.यासह असे अनेक लहान मोठे चांगले उपक्रम कृषी उत्पन्न बाजार समितीने राबविल्याचे त्यांनी सांगितले.
भविष्यातही चांगल्या योजना……
आमचे संचालक मंडळ एवढ्यावरच थांबले नसून नामदार अनिल दादांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीचे नवनिर्माण करण्याचा आमचा संकल्प आहे. मुख्य रस्त्यालगत मार्केटच्या संकुलातील वरच्या बाजूला गाळ्यांचे काम अपूर्ण असल्याने तेथे टाकलेला पैसा वायफळ जावू नये म्हणून त्याठिकाणी मार्केटवर कोणताही बोजा न येता सारस योजनेतून गाळे घेणाऱ्यांनी स्वतः बांधून वापरायचे या तत्वावर १०० गाळे निर्माण करणार आहोत. यातून जमा होणाऱ्या अनामत रक्कमेतून कर्जफेडीसाठी रक्कम वापरायचे नियोजन आहे. त्यामुळे मार्केटवरील कर्जाचा बोजाही कमी होईल आणि भाडे सुरू झाल्यावर मार्केटचे उत्पन्न देखील वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले. याव्यतिरिक्त शेतकरी निवास व भोजनालय निर्मिती, हमाल व मापाडी भवनाचे पुनर्जीवन, शेतकरी सुविधा केंद्र यासह तत्कालीन सभापती तथा आताचे मंत्री अनिल दादा पाटील यांनी शेतकरी हितासाठी राबविलेला खुला कापूस खरेदी लिलाव पुन्हा सुरू करण्याचा मानस त्यांनी व्यक्त करत, त्यासाठी जिनर्स यांचेशी बोलणे सुरू असून प्रस्तावित कोल्ड स्टोरेज देखील लवकर उभारण्याचे प्रयत्न आमचे सुरू असल्याचे सभापतीनी सांगितले.
नोकरभरती बाबतही अपप्रचार,,
नोकरभरती बाबत बोलताना सभापती पाटील म्हणाले की याबाबत चुकीचा अपप्रचार होत असून कायम नोकरभरती करण्याचा आमचा कोणताही प्रयत्न नाही, खरेतर आतापर्यंत इथे पुढाऱ्यांचीच मुले भरली गेली आहेत, आजही खेडा खरेदी, भरारी पथक यासाठी मनुष्यबळ कमी पडत असल्याने काही कंत्राटी कर्मचारी घेण्याची संकल्पना आम्ही मांडली आहे, त्यातही वायरमन, वेल्डर, सॉफ्टवेअर संगणक तज्ञ आदींना प्राधान्य देण्याचा मानस आहे मात्र अजून कोणतीही तशी परवानगी आम्ही घेतलेली नाही असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
बैठकीत पावित्र्य राखले पाहिजे.
दि १८ ऑक्टोबर च्या संचालक मंडळाच्या बैठकीत काहींनी पावित्र्य न राखता द्वेष डोक्यात ठेऊन विनाकारण राढा घालायचा म्हणून घातला, सभापतीना अरेरावीचेही प्रकार घडले, यावेळी महिला संचालक उपस्थित असताना अश्लील शिवीगाळ देखील केली गेली, हे अशोभनीय असून अश्या बैठकीत आम्ही का म्हणून यावे अशी तक्रार महिला संचालकांनी केली आहे. पूर्वीची अवाजवी खर्चाची प्रथा आम्ही मोडीत काढली असून आम्ही सर्व खरे शेतकरी पुत्र असल्याने चुकीचे काम व चुकीचे
खर्च करणारच नाहीत अशी ग्वाही देखील त्यांनी दिली. यापुढे कुणीही बैठकीत असे असभ्य प्रकार केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशाराही अशोक पाटील यांनी दिला.
गोडावून लिलावाची अनियमितता तपासणार
तत्कालीन संचालक मंडळाने ४८ गोडावून चा ओपन लिलाव केला, यासाठी प्रत्येकी आठ ते दहा लाख अनामतही घेतली, रक्कम घेतली गेली असताना लिलाव रद्द केला आणि पैसेही परत केले त्यानंतर तेच गोडावून फक्त एक लाख रुपये घेऊन दिले गेले असे होण्याचे कारण काय? मार्केटला मोठी अनामत मिळाली असताना ती परत दिलीच का? असे अनेक प्रश्न निर्माण झाले असून हा प्रकार अनियमित वाटत असल्याने याची सहकार क्षेत्रातील तज्ञ लोकांची समिती नेमून चौकशी केली जाईल व अनियमितता आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर मार्गाने कारवाई केली जाईल असा इशारा अशोक पाटील यांनी दिला. भ्रष्टाचार करणार ही नाही आणि कुणाचा सहन देखील करणार नाही असा खुलासा देखील त्यांनी केला.
सदर पत्रकार परिषदेत संचालक समाधान धनगर, प्रकाश अमृतकर, सौ पुष्पा विजय पाटील,भाईदास सोनू भिल, शरद पाटील व सचिव उन्मेष कुमार राठोड उपस्थित होते.
अमळनेर बाजार समिती सौरऊर्जेवर चालणार !
मंत्री अनिल पाटील यांच्या सहकार्याने बाजारसमितीला विजबीलच्या सहभागासाठी एक कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यामुळे सर्व बाजार समितीचे दिवे आता सौर ऊर्जेवर चालतील. बाजार समितीत थंड व शुद्ध पाण्याची व्यवस्था स्वखर्चाने केली आहे असे सांगून विद्यमान संचालकांच्या काळात योग्य कारभार असल्याचे सभापती पाटील म्हणाले.