जळगाव विमानतळ विस्ताराला गती – नव्या सुविधांसाठी केंद्राचा सकारात्मक प्रतिसाद..

आबिद शेख/ अमळनेर
जळगाव विमानतळाच्या विस्तार आणि सुधारणा प्रकल्पाला केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवला असून, नागरी विमानन मंत्रालयाने यासंदर्भात सकारात्मक भूमिका घेतली आहे. रनवे विस्तार, टर्मिनल सुधारणा आणि विमानसेवा वाढवण्याच्या मागण्यांवर भर देण्यात आला आहे.
विस्तार आणि नव्या सुविधा
नागरी विमानन मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या माहितीनुसार, विमानतळाच्या टर्मिनलचे क्षेत्र 500 चौ. मीटरपर्यंत वाढवले जाणार आहे. यामुळे प्रस्थान आणि आगमन लाउंजमध्ये प्रत्येकी 75 प्रवासी बसू शकतील. तसेच, सॅक बार, ट्रॉली आणि वाहनतळ व्यवस्थापनासाठी निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे, ज्यामुळे प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा मिळतील.
मास्टर प्लॅन अंतिम टप्प्यात
भविष्यात विमानतळाच्या टर्मिनल आणि एप्रनला उत्तरेकडे हलवण्याचा प्रस्ताव असून, पायाभूत सुविधांच्या विस्तारासाठी विस्तृत नियोजन तयार करण्यात आले आहे. प्रवासी संख्येत वाढ झाल्यास आणखी मोठ्या प्रमाणावर सुधारणा करण्यास मंत्रालय तयार आहे.
नवीन विमानसेवा सुरू होण्याची शक्यता
खासदार स्मिता वाघ यांनी जळगावसाठी अधिक विमानसेवा सुरू करण्याची मागणी केली होती. सध्या कोणत्याही एअरलाइनकडून अतिरिक्त उड्डाणांचे प्रस्ताव नाहीत, मात्र भविष्यात मागणी वाढल्यास सकारात्मक विचार केला जाईल, असे नागरी विमानन मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
खासदार स्मिता वाघ यांची प्रतिक्रिया
“जळगाव विमानतळाच्या सुधारणा आणि विस्तारासाठी केंद्र सरकार सकारात्मक आहे. हे प्रकल्प लवकर पूर्ण करण्यासाठी सतत पाठपुरावा सुरू आहे. व्यापारी, उद्योजक आणि नागरीकांसोबत चर्चा करून अधिक विमानसेवा मिळवण्यासाठी पुढील रणनीती ठरवली जाईल,” असे खासदार वाघ यांनी सांगितले.
विकासाचा लाभ
विमानतळाच्या विकासामुळे व्यावसायिक, औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्राला चालना मिळेल. उत्तम हवाई सेवांमुळे नवीन गुंतवणूकदारांना प्रोत्साहन मिळेल आणि पर्यटन क्षेत्रालाही नवी दिशा मिळेल. जळगावसारख्या वाढत्या शहराला सक्षम विमानसेवा असणे आवश्यक असून, स्थानिक पातळीवर अधिक प्रयत्न केले जातील.