“अमळनेर नगरपालिकेच्या वतीने महास्वच्छता अभियान, स्वच्छता शपथ व वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.”

0

आबिद शेख/अमळनेर


अमळनेर – अमळनेर नगरपालिकेच्यावतीने स्वच्छ भारत अभियान – स्वच्छ सर्वेक्षण २०२५ व माझी वसुंधरा अभियान ६.० अंतर्गत बोरी नदी पात्रात महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्या नेतृत्वाखाली बुधवार, दि. २५ जून २०२५ रोजी सकाळी ११ वाजता संत सखाराम महाराज मंदिर परिसर व नदीपात्रात हे अभियान पार पडले.

या उपक्रमात ‘घनकचरा व्यवस्थापन व सफाई अपनावो, बिमारी भगावो’ या मोहिमेअंतर्गत बोरी नदी पात्रातील प्लास्टिक, कागद, बांधकाम कचरा, निर्माल्य आदी मोठ्या प्रमाणात गोळा करून साफसफाई करण्यात आली. यावेळी एकूण अडीच टन कचरा जमा करण्यात आला.

दरवर्षी संत सखाराम महाराज यात्रा उत्सवात नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर कचरा जमा होतो. पावसाळा सुरु झाल्याने यंदा विशेष काळजी घेत महास्वच्छता अभियान राबवले गेले.

याच उपक्रमांतर्गत तांबेपुरा व शिवशक्ती चौक येथील खुल्या भूखंडांवर वृक्षारोपण करण्यात आले. मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्या हस्ते हे वृक्षारोपण करण्यात आले. उपस्थित कर्मचाऱ्यांना स्वच्छता शपथ दिली गेली.

मुख्याधिकारी श्री. नेरकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना दैनंदिन जीवनात प्लास्टिक टाळून कापडी पिशव्या वापरण्याचे आवाहन केले. तसेच नगरपालिका पुरवणाऱ्या संरक्षण साहित्याचा वापर करून आरोग्याची काळजी घेण्याचीही सूचना दिली.

त्यांनी नगरपालिका माध्यमिक शाळेच्या नुकत्याच झालेल्या नुतनीकरणाचा उल्लेख करत सफाई कर्मचाऱ्यांनी आपल्या मुलांना त्या शाळेत प्रवेश देऊन चांगले शिक्षण घेण्यास प्रोत्साहन द्यावे, असेही आवाहन केले.

या उपक्रमात स्वच्छता निरीक्षक किरण कंडारे, प्रभाग मुकादम पुनमचंद संदानशिव, सोमनाथ संदानशिव, राहुल संदानशिव, गौतम बिऱ्हाडे, शहर समन्वयक गणेश गढरी, श्याम करंदीकर, अनंत संदानशिव, सतीश बिऱ्हाडे, महेंद्र बिऱ्हाडे, युनुस शेख तसेच महिला हौसिंग ट्रस्टच्या महिला पदाधिकारी, पर्यावरण सखी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!