अवाजवी वसुलीमुळे यात्रेतील व्यापारी दुकाने बंद करून धडकले पालिकेत!

अमळनेर ( प्रतिनिधि ) येथील नगरपरिषद तथा ठेकेदारांकडून करण्यात येणारी वसुली अवाजवी असल्याने मीना बाजार ,कटलरी व किरकोळ विक्रेत्यांनी परवापासून निषेध म्हणून आपली दुकाने बंद ठेवली होती.
काल दुपारी ते सर्व व्यापारी पालिकेत धडकले होते.नदीपात्रात जागा मिळण्यासाठी पालिकेला भाडे भरावे लागते.मात्र पालिकेने ठेका दिल्याने ठेकेदार अवाजवी वसुली करत आहेत. त्या पावतीवर नाव व शिक्का नाही. पैसे न दिल्यास मारहाण करू आणि माल जप्त करू अशी धमकी दिली जात असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला. फी कमी करत नाही तोपर्यंत दुकाने बंद ठेवू अशी भूमिका दुकानदारांनी घेतल्याने दोन दिवस महिलांना खरेदी करता आली नाही. पोलीस नाईक शरद पाटील यांनी व्यापाऱ्यांची समजुत घातली. मुख्याधिकारी सरोदे यांनी लक्ष घालण्याची मागणी दुकानदारांनी केली होती.
काल सर्व व्यापारी पालिकेत धडकले असता मुख्याधिकारी प्रशांत सरोदे अनुपस्थित असल्याने त्यांच्या वतीने प्रशासन अधिकारी संजय चौधरी व वसुली विभागाचे महेश जोशी यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले.पूर्वी 50 रुपये आमच्या कडून घेतले जायचे आता 100 रुपये घ्या मात्र अवाजवी वाढ करू नका अशी मागणी सर्वांनी केली यावर चौधरी यांनी मुख्याधिकारी आणि संबंधित ठेकेदार यांच्याशी चर्चा काढून योग्य तो मार्ग काढू कुणाचेही नुकसान होणार नाही याची ग्वाही दिल्यानंतर व्यापारी माघारी फिरले.या बंद मुळे यात्रेकरूंमध्ये नाराजीचा सूर दिसून आला आहे.