देशातील पाच धार्मिक स्थळांवर
हल्ल्याचा सत्ताधाऱ्यांचा कट
■ प्रकाश आंबेडकर यांचा सनसनाटी आरोप..

24 प्राईम न्यूज 16 Sep 2023 देशात होऊ घातलेल्या निवडणुका जिंकण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी ५ महत्त्वाच्या धार्मिक स्थळांवर हल्ला करून अशांतता पसरवण्याचा कट रचला आहे. याची खात्रीशीर माहिती आपल्याला मिळाल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी केला. त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.
आंबेडकर म्हणाले, “भाजप हिंदूंच्या मतांचे ध्रुवीकरण करून आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्याच्या प्रयत्नात आहे. यासाठी देशातील ५ महत्त्वाच्या धार्मिक स्थळांवर हल्ले करण्याचा कट रचला जात आहे. यासंबंधीची खात्रीशीर माहिती आपल्याला मिळाली असून, त्याची खबर शासनाच्या गुप्तहेर खात्यालाही मिळाली आहे. त्यामुळे आगामी निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी तथा शांतता अबाधित ठेवण्यासाठी देशातील प्रमुख धार्मिक स्थळे लष्कराच्या ताब्यात देण्यात यावीत,” अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर बोलताना आंबेडकर म्हणाले, “गत ९ वर्षांत एखाद्या समाजावर अन्याय, अत्याचार करून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला गेला. मध्यंतरी औरंगजेबाच्या नावाचे राजकारण केले गेले. वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकेमुळे हा वाद थांबला. आता मराठा विरुद्ध ओबीसी, असा वाद पेटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. याचा अर्थ देशात अशांतता माजवण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी हिंदू धर्मीयांच्या जिव्हाळ्याच्या मंदिरांवर हल्ला केला जाणार आहे, असे आंबेडकर म्हणाले. लोकसभेच्या विशेष अधिवेशनावर टीका करताना आंबेडकर म्हणाले, “हे अधिवेशन केवळ फोटोसेशनसाठी आहे. सरकारच्या अजेंड्यावरून कोणतीही महत्त्वाची विधेयके नाहीत. या धार्मिक स्थळांना धोका
वाराणसीची ज्ञानवापी मशीद, अयोध्येतील राम जन्मभूमी मंदिर, मथुरा शाही ईदगाह, जम्मू कटरा येथील वैष्णोदेवी मंदिर, दिल्लीचे स्वामीनारायण मंदिर, अक्षरधाम मंदिर या धार्मिक स्थळांवर हल्ला होण्याची शक्यता आहे. भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची धार्मिक ध्रुवीकरण करण्याची वृत्ती आहे. या वृत्तीला चालना मिळू नये, यासाठी निवडणुका होईपर्यंत ही सर्व मंदिरे सैन्याच्या ताब्यात द्यावीत, अशी आम्ही मागणी केली आहे. निवडणुकीला धार्मिक रंग मिळू नये हा आमचा हेतू आहे, असे आंबेडकर म्हणाले.