अमेरिकी सरकारच्या अमानवी वागणुकीचा निषेध, एकता संघटनेची आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगात तक्रार..

0

24 प्राईम न्यूज 8 Feb 2025. -अमेरिकेत अनधिकृतपणे वास्तव्यास असलेल्या १०४ भारतीय नागरिकांना अमानवी पद्धतीने परत पाठवण्यात आले असून, ही कृती भारताच्या सार्वभौमत्वावर आणि सन्मानावर आघात करणारी आहे. या घटनेचा तीव्र निषेध करत जळगाव जिल्हा एकता संघटनेने आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.

ही तक्रार भारतातील आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे अध्यक्ष नेमसिंग प्रेमी यांच्याकडे सादर करण्यात आली आहे. तसेच, या तक्रारीची प्रत भारतातील अमेरिकी दूतावासाचे प्रमुख जॉर्गन के. एड्रयुज आणि भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांना देण्यात आली आहे.

पंतप्रधानांनी लक्ष घालावे आणि तातडीने कारवाई करावी

एकता संघटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती केली आहे की, अमेरिकेने भारतीय नागरिकांवर केलेल्या अमानवी वागणुकीची तातडीने दखल घ्यावी. तसेच, भविष्यात अशा प्रकारे परत पाठवण्यात येणाऱ्या नागरिकांसाठी भारत सरकारने स्वतःचे विशेष विमान पाठवून त्यांना सन्मानपूर्वक मायदेशी परत आणावे.

अमेरिकी सरकारविरोधात निदर्शने

संघटनेने श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानाजवळील कोर्ट चौकात जोरदार निदर्शने करत अमेरिकेच्या या कृत्याचा निषेध केला. संघटनेचे समन्वयक फारुक शेख, मतीन पटेल आणि मजहर खान यांनी अमेरिकी सरकारच्या अमानवी धोरणांविरोधात आवाज उठवला.

या आंदोलनात एकता संघटनेचे समन्वयक फारुक शेख, संघटक मझहर पठाण, नदीम मलिक, मतीन पटेल, आरिफ देशमुख, युसुफ पठाण, नजमुद्दीन शेख, कासिम उमर अजीम शेख, अनिस शहा, बोरगावचे मोहसीन पठाण आणि नाजीम खान आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!