सफाई कर्मचाऱ्यांची मोबाईल द्वारे बायोमेट्रिक्स हजेरी तात्काळ बंद करावी – कर्मचारी संघटनेची मागणी..

आबिद शेख/अमळनेर
अंमळनेर नगरपरिषदेमार्फत सफाई कर्मचाऱ्यांची मोबाईल द्वारे बायोमेट्रिक्स हजेरी घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, शासनाचे कोणतेही सक्तीचे आदेश नसतानाही ही पद्धत अवलंबली जात असल्याने सफाई कर्मचारी संघटनेने यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
अखिल महाराष्ट्र सफाईगार व चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे जनरल सेक्रेटरी श्री. किशोर बाबुराव संगेले, उपाध्यक्ष श्री. रमेश हिरालाल फलोसे, आणि अध्यक्ष श्री. अनिल सुभाष बैंडवाल यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बहुतांश सफाई कर्मचाऱ्यांकडे स्मार्टफोन नाहीत. काहींना मोबाईल असला तरी त्यांच्याकडे रिचार्ज करण्यासाठी आर्थिक क्षमता नाही. विशेषतः महिला कर्मचारी अशिक्षित असल्याने त्यांना मोबाईल वापरणे अवघड जाते. शिवाय, नेटवर्क समस्या आणि तांत्रिक अडचणींमुळेही अनेक वेळा हजेरी नोंदवणे कठीण होते.
सफाई कर्मचाऱ्यांचा मासिक वेतन घरखर्चासाठी अपुरा पडत असताना, मोबाईल इंटरनेटसाठी खर्च करणे अन्यायकारक आहे. शिवाय, या नव्या प्रणालीबाबत कोणतीही पूर्वसूचना किंवा चर्चा नगरपरिषदेकडून करण्यात आलेली नाही. त्यामुळे संघटनेने तात्काळ ही सक्ती थांबवावी आणि मोबाईल द्वारे घेतली जाणारी बायोमेट्रिक्स हजेरी बंद करावी, अशी मागणी केली आहे.
संघटनेने नगरपरिषद प्रशासनाला यासंदर्भात लेखी निवेदन दिले असून, जर तातडीने निर्णय घेण्यात आला नाही, तर पुढील आंदोलनात्मक पावले उचलली जातील, असा इशारा कर्मचारी संघटनेने दिला आहे.