केंद्रीय मंत्र्याच्या कन्येची छेडछाड प्रकरणी आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी..

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर – केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या कन्येची छेडछाड करणाऱ्या आरोपींना तातडीने अटक होत नसल्याने सर्वसामान्य शेतकरी व कष्टकरी वर्गातील मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करून कठोर शासन व्हावे, अशी मागणी करत विविध राजकीय पक्ष, सामाजिक कार्यकर्ते आणि पाडळसरे धरण जन आंदोलन समितीच्या वतीने तहसीलदार रुपेशकुमार सुराणा आणि पोलीस उपविभागीय अधिकारी विनायक होते यांना निवेदन देण्यात आले.
अमळनेर तहसील कार्यालयात झालेल्या चर्चेदरम्यान, आरोपींना राजकीय पाठबळ मिळाल्याने ते फरार होण्यास मदत झाल्याचा आरोप करण्यात आला. यामध्ये पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांचे सहकार्य असल्याचा संशय व्यक्त करत, दोषी अधिकाऱ्यांवरही कारवाईची मागणी करण्यात आली.
या वेळी पाडळसरे धरण जन आंदोलन समितीचे प्रमुख सुभाष चौधरी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सुरेश किरण पाटील, ग्राहक मंचाचे जिल्हाध्यक्ष हेमंत भांडारकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय पुनाजी पाटील, अमळनेर अर्बन बँकेचे व्हाईस चेअरमन रणजित शिंदे, शिंदे सेनेचे जिल्हा उपप्रमुख महेश देशमुख, काँग्रेसचे जेष्ठ नेते धनगर दला पाटील, महेंद्र बोरसे यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
या प्रकरणी पोलीस प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून संबंधित आरोपींना कठोर शासन करावे, अशी एकमुखी मागणी करण्यात आली.