अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीला राज्यात १७वे, जिल्ह्यात पहिल्या क्रमांकाचे यश! – जळगाव जिल्ह्यात पहिली, नाशिक विभागात तिसरी..

आबिद शेख/ अमळनेर
अमळनेर – बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत पणन संचालनालयामार्फत जाहीर करण्यात आलेल्या गुणवत्ता मूल्यांकनात अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीने राज्यात १७वे, नाशिक विभागात तिसरे आणि जळगाव जिल्ह्यात पहिले स्थान पटकावले आहे.
या क्रमवारीत अमळनेर बाजार समितीला पायाभूत सुविधा व सेवा – ४४.५ गुण, आर्थिक कामकाज – ३० गुण, वैधानिक कामकाज – ४८ गुण आणि इतर निकषांवर – १९ गुण मिळून एकूण १४१ गुण प्राप्त झाले आहेत.
या यशामागे समितीचे सभापती अशोक पाटील, सचिव डॉ. उन्मेष राठोड, अधिकारी, कर्मचारी, संचालक मंडळ, हमाल, मापाडी, व्यापारी, शेतकरी यांचे मोलाचे योगदान आहे. पारदर्शक व शेतकरीहितकारक कारभार, रोखीने पेमेंट, न्याय्य व्यवहार, आणि व्यापारी-कर्मचाऱ्यांचा सहकार्यभाव यामुळे बाजार समितीने हे यश संपादन केले.
१६ मे २०२३ रोजी सभापती पदाची धुरा स्वीकारलेले अशोक पाटील यांच्या नेतृत्वाखाली, माजी मंत्री अनिल पाटील, खासदार स्मिता वाघ, माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाने आणि सत्ताधारी-विरोधक संचालक मंडळाच्या सहकार्याने हे घवघवीत यश मिळवले आहे.