भरदिवसा 3 लाखांची रोकड लंपास – अमळनेरात अज्ञात चोरट्याचा कारनामा!

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर : शहरातील बाजारपेठ परिसरात भरदिवसा एका शेतकऱ्याच्या मोटरसायकलवरून तब्बल ३ लाख रुपये रोख रक्कम असलेली पिशवी अज्ञात चोरट्याने लंपास केली. ही घटना आज दुपारी सुमारे १.३० वाजेच्या सुमारास विजय शॉपीसमोर फळांच्या हातगाडीजवळ घडली.

फिर्यादी शिवाजी भानुदास पाटील (वय ५९, रा. वासरे, ता. अमळनेर) यांनी अमळनेर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, आज त्यांनी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अमळनेर शाखेतून शेतीसाठी लागणाऱ्या बियाणे व खतांच्या खरेदीसाठी ३,००,००० रुपये रोख काढले. ही रक्कम त्यांनी निळ्या रंगाच्या कापडी पिशवीत ठेवून ती स्वतःच्या बजाज प्लॅटीना (MH 19 TY 5135) मोटरसायकलच्या हँडलला टांगली होती.
पुढे ते बाजारपेठेत बियाणे व खते खरेदीसाठी गेले असताना, त्यांच्या मुलाचा फोन आल्यावर ते विजय शॉपीसमोरील फळांच्या हातगाडीवर आंबे खरेदी करीत होते. तेव्हा कुणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या मोटरसायकलवरील पैशांची पिशवी चोरून नेली चोरीस गेलेली रक्कम ₹1,00,000/- (₹100 दराच्या १० बंडल नोटा) ₹2,00,000/- (₹500 दराच्या ४ बंडल नोटा) एकूण: ₹3,00,000/- रोख पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेची नोंद अमळनेर पोलीस ठाण्यात गु.नं. 230/2025, भादंवि कलम 303(2) नुसार करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास पोहेकॉ 1303 विनोद सोनवणे करीत आहेत.

ही घटना वर्दळीच्या भागात भरदिवसा घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवावी, अशी मागणी होत आहे.