पाडळसरे धरण प्रकल्पाला केंद्र सरकारची अंतिम मंजुरी; जनआंदोलनाला मिळाले यश..

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर – दिल्ली येथे जलशक्ती मंत्रालयाच्या गुंतवणूक मंडळाच्या (पीआयबी) बैठकीत निम्न तापी प्रकल्पातील पाडळसरे धरणास अखेर अंतिम मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे पाडळसरे धरणाचा समावेश ‘प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत’ होण्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल पाडळसरे धरण जनआंदोलन समितीने जलशक्ती मंत्री ना. सी. आर. पाटील यांच्यासह सर्व संबंधित मान्यवरांचे जाहीर आभार मानले आहेत.

धरण प्रकल्पासाठी केंद्र सरकारच्या कृषी सिंचन योजनेत समावेश मिळावा म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून जनआंदोलन समिती सातत्याने प्रयत्नशील होती. यासाठी विविध पातळीवर आंदोलन, मागण्या व पाठपुरावा करण्यात आला होता. विधानसभा निवडणुकीपूर्वी जलशक्ती मंत्री ना. सी. आर. पाटील यांनी तत्कालीन मंत्री आ. अनिल पाटील व खासदार स्मिता वाघ यांच्या उपस्थितीत दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करत पीआयबी बैठकीत मंजुरी देण्यात आली.
या निर्णयामुळे प्रकल्पासाठी भरीव निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून कामाला गती मिळणार आहे.
पाडळसरे धरण जनआंदोलन समितीतर्फे प्रसिद्ध केलेल्या पत्रकात ना. सी. आर. पाटील, राज्याचे जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन, माजी मंत्री आ. अनिल पाटील, खा. स्मिता वाघ यांचे विशेष आभार मानण्यात आले आहेत.

या पत्रकावर सुभाष चौधरी, देविदास देसले, सुनील पाटील, महेश पाटील, रणजित शिंदे (अमळनेर अर्बन बँकेचे व्हॉईस चेअरमन), रामराव पवार, दिनेश शेलकर, हेमंत भांडारकर, सुरेश पाटील, पुरुषोत्तम पाटील, अजय पाटील आदींच्या सह्या आहेत.